Wednesday 18 January 2017

उपवासाचा हेतू ...!!!

                                 
                                     
                " विषया विनिर्तन्ते निराहारस्य देहीन:"  निराहार  करणाऱ्यांचे मन विषयापासून परावृत्त होते. विषय वासनेचे उगम स्थान मन हे आहे. म्हणून यालाच परावृत्त करावे लागते.अन्यथा अधिक विषयोपभोगाने शरीर व बुद्धी याची हानी होऊन लवकर वार्धक्य येते.सगळे काही मनावर अवलंबून आहे म्हणून तर मनाला जास्त बंधने घातली आहेत समर्थ रामदास स्वामीं नी तर पदोपदी बोध केला आहे, ।।मना वासना दुष्ट कामा न येरे । मना सर्वथा पाप बुद्धी नको रे।।  मन धर्मता नीती सोडू नको हो। मना अंतरी सार विचार राहो। असे अनेक बोध मनाच्या श्लोकात समर्थ सांगतात. तसेच आपल्या पूर्वासुरींनी मंत्राची व्याख्या पण मनाशीच संबंधित केली आहे ती अशी " मननात्  त्रायतेति मंत्र:" जो मनाला तारून नेतो त्यास मंत्र म्हणावे.

             सध्या अनेक साधनांमुळे माणसांचे कष्ट कितीतरी कमी झाले आहेत. व्यायाम करीत नाहीत.भरपूर खाणे व बसून राहणे असे होते त्यामुळे मेद (स्थूलपणा) वाढत आहे. त्यामुळे शरीर बेडौल व अकार्यक्षम होते.हि स्थूलता घालवण्यासाठी म्हणजेच वजन कमी करण्यासाठी लिक्विड डाएटिंग करतात. हे डाएटिंग बरेच दिवस करावे लागते व उलट त्याचाच त्रास होऊ लागतो. त्यापेक्षा व्रत करून उपवास केलेले चांगले कारण त्यामुळे वजनही कमी होते व पुण्यसंचय हि होतो. उपोषण हे अनेक प्रकारच्या शारीरिक व मानसिक व्याधींवर उपयुक्त आहे हे रशियन डॉ. वाय. एस. निकॉलायन यांनी  मान्य केले.  ते मास्को मधील मेडिकल सायन्स चे प्राध्यापक आहेत .ते म्हणाले आम्हीही उपोषणाचा प्रयोग ५००० रोग्यांवर करून पहिला , त्याचा चांगला गुण येतो असे आढळून आले आहे.आपल्या शास्त्रांनी व्रत व उपवास यांची सांगड माणसाच्या आरोग्य रक्षणा करीता किती विचारपूर्वक व कितीतरी वर्षांपासून घातली आहे.  पण आपले ते बावळटपनाचे हि समजूत अद्यापही जात नाही व अशा गोष्टींचा पश्चात्यांनी अभ्यास करून संगीतले कि  ते पटते असे झाले आहे.आपल्या पूर्वासुरींनी काहीही विचार न करता काहीतरी सांगितले असे मुळीच नाही. पश्चात्यांपेक्षा आपले पूर्वज कितीतरी बुद्धिवान होते. कोणत्याही बाबतीत भारतीयांची बुद्धी कमी पडते , असे नाही. याबाबत असलेला न्यूनगंड आपण काढून टाकला पाहिजे.सध्याच्या यांत्रिक व धकाधकीच्या जीवनात उपोषण करणे कठीण होते असे काही जणांचे म्हणणे आहे. त्या करिता शास्त्राने फलाहार ,एकभुक्त, नक्त ( सुर्यास्ता नंतर एकदा जेवणे) अयाचीत व हविष्यान्न असे उपाय सांगितले आहेत.  गृहस्थ माणसाने काहीही न खाता पिता उपोषण करू नये , असा निषेध आहे. त्या करता उपोषणाच्या पदार्थापैकी एखादा पदार्थ थोडा खाऊन  एकदा पाणी प्यावेच , असे उपोषण करण्याने काय लाभ होतो ते प्रत्यक्ष करून पाहणे इष्ट आहे.  उपोषणाचा दंभ मात्र करू नये।। धर्मशास्त्र निर्णय।। जय श्रीराम।🙏

No comments:

Post a Comment